'धमकी देऊ नका'; NEET निकालावर प्रश्न उपस्थित झाल्यावर NTA चा इशारा, केजरीवाल काय म्हणाले?

फोटो स्रोत, Getty Images
NEET 2026 च्या परीक्षेत घोळ झाल्याचा गंभीर आरोप आर्या सिंह नावाच्या विद्यार्थिनीने केला आहे. तिने याविषयीचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर अनेक राजकीय पक्ष तिच्या बाजूने उभे राहिले आहेत.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए' (NTA) ही संस्था नीट परीक्षा घेते. यावर्षी नीटचा पेपर लीक झाल्याच्या मुद्द्यावरून झालेल्या प्रचंड गदारोळानंतर ही परीक्षा आधी रद्द करण्यात आली होती आणि त्यानंतर ती पुन्हा घेण्यात आली.
पण परीक्षा पुन्हा घेतल्यानंतरही आता त्या परीक्षेच्या निकालावर गंभीर आरोप केले जात आहेत.
दरम्यान, परीक्षेच्या निकालाबाबत होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर एनटीएने (NTA) स्पष्ट केले आहे की, ते या सर्व आरोपांची चौकशी करत आहेत.
नेमके आरोप काय?
आर्या सिंहने व्हीडिओमध्ये सांगितले आहे की, 13 जुलैच्या रात्री एनटीएच्या (NTA) वेबसाईटवर ओएमआर (OMR) शीट प्रसिद्ध करण्यात आली.
"या ओएमआर शीटमध्ये प्रश्नांचा क्रम (सिक्वेन्स) चुकीचा होता, तरीही मला यामध्ये एकूण 609 गुण मिळाले होते. यानंतर मी चॅलेंज पोर्टलवर जाऊन याविरोधात तक्रार नोंदवली," अशी माहिती आर्या सिंहने दिली.
या व्हीडिओमध्ये आर्या सिंह काही कागदपत्रांसह दिसत आहे. मात्र या कागदपत्रांमध्ये नेमके काय लिहिले आहे हे वाचणे शक्य नाही आणि बीबीसी या दाव्यांची सत्यता पडताळू शकलेले नाही.

फोटो स्रोत, @yadavakhilesh
तक्रार केल्यानंतर त्याच दिवशी आपल्याला एनटीएच्या अधिकृत वेबसाईटवर अपडेटेड म्हणजेच सुधारित ओएमआर शीट मिळाली, असे तिचे म्हणणे आहे.
आर्या सिंह म्हणाली, "या अपडेटेड शीटमध्ये सर्व प्रश्नांचा क्रम बरोबर झाला होता आणि मला 609 गुणच मिळाले होते."
ती पुढे म्हणाली, "यानंतर जेव्हा परीक्षेचा निकाल लागला तेव्हा मला 540 गुण देण्यात आले होते. मात्र साधारण 1 तासानंतर जेव्हा मी एनटीएच्या वेबसाईटवर निकाल पाहिला तेव्हा माझे एकूण गुण 167 करण्यात आले."
आर्या सिंहने सांगितले की, तिने या संदर्भात एनटीए (NTA) आणि देशाच्या शिक्षण मंत्र्यांना ई-मेल केला आहे.
आर्या आता या प्रकरणात स्वतःसाठी देशाचे पंतप्रधान आणि शिक्षण मंत्र्यांकडे न्यायाची मागणी करत आहे.
'धमकी देऊ नका'; केजरीवाल यांची प्रतिक्रिया
एनटीएने (NTA) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर NEET 2026 च्या निकालांबाबत मिळणाऱ्या तक्रारींवर आपली बाजू मांडली आहे. मात्र, त्यांनी कोणत्याही एका ठराविक प्रकरणाचे नाव घेतलेले नाही.
एनटीएचे म्हणणे आहे, "एनटीए सर्व तक्रारींवर सतत लक्ष ठेवून आहे आणि त्यांची सखोल चौकशी करत आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या अनेक ओएमआर शीट या बनावट किंवा एआयच्या मदतीने बनवलेल्या निघाल्या आहेत."
त्यांनी इशारा दिला, "विद्यार्थी आणि पालकांनी तपासासाठी फक्त ओरिजिनल ओएमआर शीटच द्यावी. जर कोणी खोटी किंवा एआयने बनवलेली ओएमआर शीट दिली, तर तक्रार करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते."

फोटो स्रोत, Getty Images
नीटची ही पोस्ट रिट्विट करत आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल म्हणाले, "धमकी देऊ नका. मुलांनी यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. तुम्ही तर अख्ख्या नीट परीक्षेचा सत्यानाश करून टाकला आहे."
"तुम्ही देशासाठी लाजीरवाणी गोष्ट बनला आहात. आता तुमची हिंमत इतकी वाढली आहे की, हतबल झालेल्या विद्यार्थ्यांनाच कायदेशीर कारवाईची धमकी देताय? कमीत कमी तुम्ही मुलांशी संवेदनशीलतेने, सहकार्याने आणि नम्रतेने वागायला हवे होते. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे," अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी दिली.

फोटो स्रोत, Getty Images
पेपर फुटल्यामुळे नीट 2026 आधी रद्द करावी लागली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ही परीक्षा 3 मेला आयोजित केली होती.
खरे तर नीट 2026 ची 3 मेची परीक्षा रद्द झाल्यानंतर अनेकांनी एनटीएला धारेवर धरले आणि या मुद्द्यावरून देशभरात जोरदार पडसाद उमटले.
अरविंद केजरीवाल यांनी एक्सवर आणखी एक पोस्ट करत म्हटलं, "पुन्हा घेतलेल्या नीट परीक्षेच्या निकालामध्येही आता प्रचंड घोळ झाल्याचे समोर येत आहे. बिचारी मुले आता न्याय मागण्यासाठी तरी कुठे जाणार?"
"मोदीजी तुमच्याकडून एक परीक्षा धड घेतली जात नाही, मग तुम्ही देश कसा चालवणार? या 12 वर्षांत तुम्ही देशाचा अगदी सत्यानाश करून टाकला आहे," अशी टीकाही केजरीवाल यांनी केली.
आर्या सिंह पोहोचली जंतर-मंतरवर
NEET गैरव्यवहाराबाबत कॉकरोच जनता पार्टी (CJP) सातत्याने आंदोलन करत आहे. सध्या सीजेपी आणि इतर विद्यार्थ्यांचे हे आंदोलन दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक देखील शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत उपोषणाला बसले होते. मात्र शनिवारी (18 जुलै) पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेऊन सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
सीजेपी आणि आंदोलन करणाऱ्या इतर संघटनांचे म्हणणे आहे की, 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ते आपल्या मागण्यांसाठी जंतर-मंतर ते संसदेपर्यंत मोर्चा काढणार आहेत.
दरम्यान कानपूरची आर्या सिंह ही देखील जंतर-मंतरवर पोहोचली असून रविवारी तिने प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या आरोपांचा पुनरुच्चार केला.

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेस पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एका पोस्टमध्ये म्हटले, "ही कानपूरची आर्या सिंह आहे. तिचे म्हणणे आहे की, पुन्हा घेतलेल्या परीक्षेच्या निकालात मोठा गोंधळ आणि घोटाळा झाला आहे. ओएमआर शीटनुसार तिला 609 गुण मिळायला हवे होते. पण निकालात तिला केवळ 540 गुण देण्यात आले."
"अशा परिस्थितीत आर्याचे संपूर्ण कुटुंब हताश झाले. सर्व जण वारंवार वेबसाईट तपासू लागले. याच दरम्यान रात्री 2 वाजता आर्याचे गुण 540 वरून कमी होऊन अचानक 167 झाले. म्हणजेच 540 गुण आपोआपच 167 झाले."
"शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानजी हीच का ती 'व्यवस्था' जिच्यासाठी तुम्ही हवाई दलाची मदत घेऊन पुन्हा नीट परीक्षा घेतली होती. तुम्हाला एक मिनिटही या पदावर राहण्याचा अधिकार नाही. थोडी तरी लाज बाळगा आणि राजीनामा द्या," अशी मागणी काँग्रेसने केली.
'नीट आहे की चीट?'
नीट (UG) 2026 ची पुन्हा घेतलेली परीक्षा 21 जूनला पार पडली होती. 17 जुलैला जाहीर झालेल्या निकालांनुसार या परीक्षेत 11 लाखाहून अधिक विद्यार्थी पास झाले.
ही परीक्षा एकूण 20 लाख विद्यार्थ्यांनी दिली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) माहितीनुसार, नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण 58 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
मात्र आर्या सिंहच्या आरोपांनंतर या परीक्षेवरून पुन्हा एकदा मोठा गदारोळ सुरू झाला आहे.
आर्या सिंहचा व्हीडिओ शेअर करत समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी 'एक्स'वर पोस्ट केली.

फोटो स्रोत, Getty Images
अखिलेश यादव म्हणाले, "नीट आहे की चीट? नीटच्या पुन्हा झालेल्या परीक्षेत घोटाळ्याच्या बातम्या वाढतच चालल्या आहेत. पण भाजपा सरकारमध्ये ना कोणाची जबाबदारी निश्चित केली जाते, ना कोणाला उत्तरदायी धरले जाते. राजीनामा देणे किंवा तो घ्यायला लावणे तर अशक्यच गोष्ट आहे."
"परीक्षार्थी म्हणत आहेत की, कडू सत्य हे आहे की भाजपच्या संघटनेत वरिष्ठ पातळीवर बसलेले स्वतःला प्रामाणिक म्हणवणारे लोक आपल्या कोणत्याही सहकारी मंत्र्यावर दबाव आणून राजीनामा घेण्याच्या स्थितीत नाहीत. कारण त्यांना भीती आहे की स्वतःला अडकताना पाहून ते मंत्री महोदय इतर सर्व भाजपा नेत्यांच्या घोटाळ्यांचे लपलेले रहस्य उघड न करून टाकोत," असंही अखिलेश यादव यांनी म्हटलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






















