जंतर-मंतरवरील आंदोलनाला उद्धव ठाकरेंची उपस्थिती, राहुल गांधी यांच्या मोदी सरकारकडे 5 मागण्या

राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि अभिजीत दिपके

फोटो स्रोत, Reuters/CocroachISBACK

फोटो कॅप्शन, राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि अभिजीत दिपके
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

दिल्लीमध्ये 21 जुलै रोजी अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि काही काळानंतर सोडून दिले.

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) चे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 21 जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात उपस्थिती नोंदवली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते अरविंद सावंत हे देखील उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच या आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी म्हटले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी जमलेल्या जनसमुदायासमोर आपले विचार प्रकट केले.

उद्धव ठाकरे यांची जंतर मंतरवर उपस्थिती

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे यांची जंतर मंतरवर उपस्थिती

उद्धव ठाकरे म्हणाले की मी या ठिकाणी भाषण देण्यासाठी नाही तर युवा शक्तीला नमन करण्यासाठी आलो आहे. राजकारणात संघर्ष हा तर रोजच असतो पण आपण कुणासाठी संघर्ष करतोय हे देखील पाहायला हवे.

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर 21 जुलै रोजी आंदोलन केले. त्यावेळी त्यांना सुरक्षा दलांनी काही काळासाठी ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले.

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यांनी म्हटले आहे की राहुल गांधी हे आपल्या राजकारणासाठी विद्यार्थ्यांचा वापर करुन घेत आहेत.

राहुल गांधी यांच्या 5 मागण्या

राहुल गांधी यांनी मोदी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. तसेच त्यांनी पाच मागण्या ठेवल्या आहेत.

राहुल गांधी म्हणाले, काही प्रश्न आहेत जे विचारणे गैर नाही. ते म्हणाले, आपल्या देशाची शिक्षण व्यवस्था का कोलमडली आहे? भारतात शिक्षण इतकं महाग का झालं आहे? मुलांना शिक्षण देण्यासाठी पालक आर्थिकदृष्ट्या का उद्ध्वस्त होत आहेत?

राहुल गांधी यांनी सरकारसमोर पाच मागण्या मांडल्या आहेत:

1. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा.

2. विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या आणि त्यांचा अपमान करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी.

3. विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत.

4. या मुद्द्यावर संसदेत चर्चा घडवून आणावी.

5. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विद्यार्थ्यांशी झालेल्या वागणुकीबद्दल देशाची माफी मागावी.

धर्मेंद्र प्रधान म्हणाले, 'राहुल गांधी विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करत आहेत'

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर विद्यार्थ्यांचा राजकीय हेतूंसाठी वापर करून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

मंगळवारी (21 जुलै) रात्री उशिरा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास झाला.

एक्सवरील पोस्टमध्ये प्रधान यांनी लिहिले की, "लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस सातत्याने विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करत आहेत, जेणेकरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अडथळा निर्माण करता येईल. राहुल गांधी आणि काँग्रेसने पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास झाला आणि ठरवून दिलेल्या सुरक्षा नियमांकडेही दुर्लक्ष करण्यात आले."

धर्मेंद्र प्रधान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, धर्मेंद्र प्रधान
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ते पुढे म्हणाले, "सरकारने या विषयावर सविस्तर चर्चा करण्याची तयारी आधीच स्पष्ट केली होती. तरीही काँग्रेसने लोकशाही मार्गाने चर्चेत सहभागी होण्याऐवजी राजकीय आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. त्यांचा उद्देश विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणे नव्हता, तर राजकीय प्रसिद्धी मिळवण्यासाठी अडथळे निर्माण करणे हा होता. राहुल गांधींसाठी हा विषय विद्यार्थ्यांचा नाही. चर्चा करण्याचा मार्ग खुला झाल्यानंतरही प्रत्येक वेळी संघर्ष निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे."

प्रधान म्हणाले, "आमचे सरकार नीट परीक्षेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आणि तरुणांच्या प्रत्येक योग्य चिंतेवर संसदेत उत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. भारतातील विद्यार्थ्यांना राजकीय मोहिमेचा भाग बनवण्यापेक्षा अधिक चांगली वागणूक मिळायला हवी. त्यांना गोंधळ नव्हे, तर विश्वास हवा आहे. घोषणा नव्हे, तर उपाय हवेत. अडथळे नव्हे, तर जबाबदारी हवी."

ते पुढे म्हणाले, "आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या केवळ रागालाच नव्हे, तर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास, सुधारणा करण्यास आणि जबाबदारी स्वीकारण्यासही बांधील आहोत. आमचे सरकार यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे."

दरम्यान, मंगळवारी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पंतप्रधानांच्या 7, लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केले होते.

यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र, काही तासांनंतर राहुल गांधी आणि ताब्यात घेण्यात आलेल्या इतर नेत्यांची छत्रसाल स्टेडियममधून सुटका करण्यात आली.

21 जुलै रोजी काय घडले ?

विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराबाहेर ठिय्या देणाऱ्या इंडिया आघाडीतील खासदारांना पोलिसांनी 21 जुलै रोजी सोडून दिले.

बीबीसीचे प्रतिनिधी पवनकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या नेत्यांना छत्रसाल स्टेडियमवर नेण्यात आलं होतं.

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचल्या होत्या.

राहुल गांधी यांच्यासोबत अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

राहुल गांधी

फोटो स्रोत, ANI

याआधी, काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी सांगितलं होतं की, पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांच्याशी गैरवर्तन केले आणि पक्षाच्या नेत्यांना कुठे नेण्यात आले आहे, याची त्यांना कल्पना नाही.

पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन करत असताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह राहुल गांधींशी चर्चा करत होते. जितेंद्र सिंह यांनी नुकताच माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय की, "मी त्यांच्याशी चर्चा करून संसदेत यावर चर्चा होईल, असं आश्वासन दिलं पण त्यांनी आपल्या मागण्या वाढवत नेल्या. ते आधीपासूनच ठरवून आले होते की, काहीतरी संघर्ष व्हावा आणि गोंधळ व्हावा, पण सामान्य लोकांना ही राजकीय नौटंकी समजते."

दुसरीकडे, संसदेत विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर चर्चा करू दिली जात नाहीये, आम्हाला संसदेतही बोलू दिलं जात नाही. पंतप्रधान संसदेत येत नाहीत आणि बोलूही देत नाहीयेत, तर मग आम्ही काय करायचं, असा प्रश्न काँग्रेसचे खासदार विचारत आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)